दहा मिनिटे उशीर अन् महिलेचा वाचला जीव   

अहमदाबाद : वेळेवर सर्वत्र पोहोचण्याची सवय कौतुकास्पद असू शकते; परंतु कधीकधी उशिरा पोहोचणेही फायदेशीर ठरते. भरूचच्या भूमी चौहानसोबतही असेच काहीसे घडले. विमानतळावर पोहचण्यास दहा मिनिटे उशीर झाल्याने ती अहमदाबादहून लंडनला जाणार्‍या एअर इंडियाच्या विमानात चढू शकली नाही. उशिरा गेलेल्या याच दहा मिनिटांनी भूमीचा जीव वाचवला. 
 
भूमी चौहान ट्रॅफिकमुळे १० मिनिटे अहमदाबाद विमानतळावर उशिराने पोहोचली. तोपर्यंत बोर्डिंग आणि चेक-इन बंद झाले होते. तिने अधिकार्‍यांना विमानात चढू देण्याची विनंती केली, पण त्यांना नकार देण्यात आला. यासाठी तिने सीआयएसएफ जवानांशी भांडण केले, खूप वाद घातला; परंतु विमानतळावरील सुरक्षा अधिकार्‍यांनी तिला जाण्याची परवानगी दिली नाही. त्यामुळे तिला खूप वाईट वाटले; पण त्याच विमानाच्या अपघाताची बातमी ऐकून ती स्तब्ध झाली.
 
भूमीचा नवरा लंडनमध्ये राहतो. अभ्यास व्हिसावर लंडनला गेल्यानंतर ती २ वर्षांनी सुट्ट्या साजरी करण्यासाठी भारतात आली होती. १२ जून रोजी तिला लंडनला परतायचे होते, पण त्याच विमानाचा अपघात झाला. भूमी म्हणाली की, विमान दुपारी १.१० वाजता उड्डाण करणार होते. बोर्डिंग प्रक्रिया दुपारी १२.१० वाजता पूर्ण झाली आणि मी दुपारी १२.२० वाजता पोहोचले. मी चेक-इन गेटवर पोहोचले आणि त्यांना विमानात चढण्याची परवानगी मागितली.मी त्यांना सांगितले की, मी सर्व औपचारिकता लवकर पूर्ण करेन, परंतु त्यांनी मला पुढे जाऊ दिले नाही. विमानतळावरून घरी निघण्याच्या तयारीत असतानाच तिला अपघाताची माहिती मिळाली. तिचा जीव वाचवल्याबद्दल तिने देवाचे आभार मानले.

Related Articles